जग निर्माण झाल्यानंतर अगदी पहिल्या दिवशीच ईश्वराने एक कुत्रा निर्माण केला आणि देव त्याला म्हणाला " प्रत्येक दिवशी तु घरा जवळ बसुन रहा आणि येणा-या किंवा
जाणा-यावर भुंकत बैस..देव म्हणाला मी तुला २० वर्षाचे आयुष्य प्रदान करतो आहे...पण त्या क्षणी कुत्रा म्हणाला " २० वर्षात मला संपुर्ण आयुष्यभर भुंकावे लागेल ..त्यापेक्षा त्यातले फ़क्त १० वर्षाचे आयुष्य मला दे..आणि उर्वरीत दहा वर्ष मी तुला साभार परत करत आहे...
हे ऐकून देव त्या कुत्र्याला म्हणाला जशी तुझी ईच्छा.. आणि म्हणाला.."तथास्तु"
दुस-या दिवशी ईश्वराने एक माकड निर्माण केले आणि देव त्याला म्हणाला "तू लोकांचे मनोरंजन कर...माकडचेष्टा आणि गमंतीनीं सर्वांना हसव...त्यासाठी मी २० वर्षाचे आयुष्य तुला प्रदान करतो आहे...पण त्या क्षणी माकड म्हणालं "माकडचेष्टांसांठी २० वर्ष घालवु..? मला ईतके आयुष्य केवळ माकडचेष्टां मध्ये घालवणे मंजूर नाही..जर कुत्र्याने १० वर्षाचे आयुष्य ज्या प्रमाणे तुला परत केले त्याच प्रमाणे मी सुध्दा माझ्या आयुष्यातले उर्वरीत दहा वर्ष तुला साभार परत करत आहे...
हे ऐकून देव त्या माकडाला म्हणाला जशी तुझी ईच्छा.. आणि म्हणाला.."तथास्तु"
तिस-या दिवशी ईश्वराने एक गाय निर्माण केली आणि देव म्हणाला "तुला शेतक-या सोबत शेतावर उन्हां-तांन्हात दिवसभर उभे रहावे लागेल आणि तुला वासरुही जन्माला घालावे लागतील..तसेच तुला दूधही द्यावे लागेल..सर्वार्थाने तुला शेतक-याला आधारच द्यावा लागेल त्यासाठी "मी ६० वर्षाचे आयुष्य तुला प्रदान करतो आहे.." हे, ऐकून गाय म्हणाली, " धन्यावाद..देवा ! " मला तु शेतक-याच्या सेवेसाठी जे काही ६० वर्षांचे आयुष्य प्रदान केले आहे त्याबद्दल..! पण मला ६० वर्षातले फ़क्त २० वर्षांचेंच आयुष्य दे.. मी सुध्दा माझ्या आयुष्यातले उर्वरीत ४० वर्ष तुला साभार परत करते आहे...
हे ऐकून देव त्या गायीला म्हणाला जशी तुझी ईच्छा.. आणि म्हणाला.."तथास्तु"
चवथ्या दिवशी ईश्वराने एक माणूस निर्माण केला आणि देव त्याला म्हणाला " खा ...झोप...खेळ...लग्न करुन जीवनातला संसारिक आनंद घे...त्यासाठी "मी २० वर्षाचे आयुष्य तुला प्रदान करतो आहे.." हे, ऐकून माणूस म्हणाला, "..काय देवा...? काय म्हणालास..फ़क्त २० वर्षांचे आयुष्य ...! फ़क्त २० वर्षांचेंच आयुष्य...!! नाही नाही ..असे मला कदापि चालणार नाही देवा "...मी तुला सांगतो.. तु दिलेले २० वर्षांचे आयुष्य तर आहेच त्यात तुला ४० वर्ष गायीने परत केलेले आहे समज.!..तसेच तुला माकडाने आणि कुत्र्याने २० वर्ष परत केलेच आहे असे सर्व मिळुन एकूण ८० वर्ष होतात ..मग माझ्या म्हणण्याप्रमाणे ८० वर्षाचे आयुष्य मला तरी प्रदान कर ..मी जास्त आयुष्याची तुला भीक मागतो देवा... !"
हे ऐकून देव त्या माणसाला म्हणाला जशी तुझी ईच्छा.. आणि देव म्हणाला व्यावहारिक दॄष्या तु एक चांगली देवाण-घेवाण केलीस.."तथास्तु"
वरील कथेचा मर्म लक्षात आलाच असेल... म्हणुन की काय..? माणुस आपल्या आयुष्यातील पहिले २० वर्ष खाणे..झोपणे..खेळणे आणि मौजमजा करण्यात घालवत असतो...
आयुष्यातले पुढील ४० वर्ष उन्हा-तान्हात काम करुन परिवाराचे पालन पोषण करुन त्याला आधार देतो. त्यापुढील आयुष्यातले १० वर्ष माणूस माकडचेष्टा करुन आपल्या नात-नातवंडांचे मनोरंजन करतो आणि आयुष्यातली शेवटची १० वर्ष घराच्या पुढील व्हरांड्यात बसुन प्रत्येकावर नजर ठेवुन ओरडत बसतो..!